श्रीरामपूर दि. 23: स्त्रीला समान दर्जा मिळाला पाहिजे, आपण मुली प्रमाणे सुनेलाही वागवावे तरच संसार सुखी होईल असे प्रतिपादन प. पू. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी केले. सुन व मुलगी यांच्या भेदभाव करु नये, दोघी स्त्रीयाच असतांना एकीला शबासकी तर दुसरीला टोमणे हा प्रकार टळला पाहिजे असे स्पष्ट करुन त्या म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे चार पुरुषार्थ आहेत, धर्मानुसार आचारण करावे, धर्मानुसार संसार केला तर मोक्षाचा मार्ग सापडतो. प्रत्येक स्त्रीने लज्जा हा दागिना जपला पाहिजे, स्त्रीयांनी मर्यादा पाळली पाहिजे, पुर्वी महिला कपाळावर गंध लावत असत आता त्या ऐवजी टिकली आली आहे, टिकल्या आल्या अन् बाथरुमच्या भिंती सौभाग्यवती झाल्या. लाल रंग हा भक्तीला रंग आहे. दोन भुवया मध्ये गंध लावावे, भुवया मधील ही जागा शक्तीचा स्त्रोत आहे. सुषमा स्वराज यांचे उदाहरण स्त्रीयांना स्फुर्तीदायक ठरते.
हल्ली केस कापण्याची फॅशन महिलामध्ये सुरु झाली आहे. केस हे निसर्गाने दिलेले सौंदर्य आहे, केस कापणे मर्यादा भंग करणारे वर्तन आहे, पुर्वी विधवांचे व दिक्षा घेतांना संताचे केशवपन करायचे. आजकल लग्नापुर्वी लुक (चेहरा), बुक (शिक्षण) आणि कुक (स्वयंपाक) या तीन गोष्टी पाहतात, मुलींचे बाह्य रुप पाहु नका, अंतरगुण पहावेत, मुलींनी सासरी गेल्यावार सासु, सासरे, नणंद आदि नातेवाईकांशी प्रेमपुर्वक व्यवहार केला तरच संसार सुखी होईल असे त्यांनी स्पष्ट केले.